शेतकरी कृती समितीचे तहसीलदारांना निवेदन

चोपडा – (साथीदार वृत्तसेवा) तालुक्यातील गूळ नदीच्या काठावरील वडती, विष्णापूर, आडगाव, नारद, खरद, अंबाडे, रुखनखेडा, तावसे खु, माचला, घुमावल खु, खडगाव, गोरगावले बु, गोरगावले खु , खेडीभोकरी या गावातील जमिनीतील पाण्याची पातळी यावर्षी खाली गेल्याने कूपनलिका या कोरड्या पडत असून पाणी टंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळे मालापूर मध्यम गुळ प्रकल्पातुन पाण्याचे आवर्तन सोडण्यात यावे या मागणीचे निवेदन शेतकरी कृती समितीच्या काही पदाधिकाऱ्यांनी चोपडा तहसीलदार अनिल गावीत यांना दिले.
दरवर्षी चोपडा व अमळनेर नगरपरिषदसाठी गूळ नदीतून पाणी सोडण्यात येत होते त्यामुळे येथील पिण्याच्या पाण्याच्या कूपनलिका ह्या व्यवस्थित चालत होत्या व त्या कारणाने पाणी आरक्षण ठेवणे चा प्रश्न आला नाही. परंतु, आता चोपडा नगरपरिषदेने सरळ धरणातून पाणी घेणे सुरू केल्याने यावर्षी येथील पिण्याच्या पाण्याच्या कूपनलिका या एकतर खोल जात आहेत किंवा बंद पडण्याच्या मार्गावर आल्या आहेत.
यावर्षी गूळ धरण १०० टक्के भरले आहे व चोपडा शहरासाठी राखीव असलेल्या पाणी व्यतिरिक्त अधिकचा पाणीसाठा उपलब्ध असून त्यातून शिल्लक पाणी नदीत सोडल्यास पावसाळा आधीच्या महिनाभर चे कालावधीसाठी या गावांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटणार आहे. यामुळे पाणी सोडण्यासाठी जिल्हाधिकारी यांना विनंती करण्याचे निवेदन तहसीलदार अनिल गावीत यांना शेतकरी कृती समितीचे भागवत काशिनाथ महाजन व मेहमूद शेख महंमद बागवान यांनी दिले.
यावेळी देण्यात आलेल्या निवेदनाच्या प्रती ना गुलाबराव पाटील पालकमंत्री, आमदार लताताई सोनवणे, खासदार रक्षाताई खडसे यांनादेखील पाठवण्यात येणार आहेत असे कृती समितीने सांगितले. निवेदनावर वसंत प्रेमराज पाटील, राजेंद्र भिमराव पाटील, अतुल महाजन, शरद महाजन, श्रीराम पाटील, दत्तात्रय पाटील, बाबुलाल पाटील, धनंजय पाटील, अतुल पाटील, श्रीकृष्ण पाटील, सचिन पाटील, दिलीप पाटील, बाबुलाल कोळी, कैलास पाटील, चंद्रकांत पाटील, प्रल्हाद पाटील, धनराज पाटील आदींच्या सह्या आहेत.