• Sat. Jul 5th, 2025

इंडोनेशियाचे गांधी विचारवंत पद्मश्री इंद्रा उदयन यांचे प्रतिपादन

जळगाव (साथीदार वृत्तसेवा) महात्मा गांधीजींच्या अहिंसा, सत्य या तत्त्वांमध्ये जग बदलविण्याची ऊर्जा आहे. या ऊर्जेचा सकारात्मक  वापर केला, तर जगातील अशांतता दूर होईल. प्रत्येकाने हे विचार प्रत्यक्ष कृतीशील आचरणात आणावे, यातून महात्मा गांधीजींना अपेक्षित रामराज्याच्या संकल्पनेतील भारत व जग घडविता येईल, असे प्रतिपादन इंडोनेशियाचे गांधी विचारवंत पद्मश्री अगुस इंद्रा उदयन यांनी केले.

जैन हिल्स येथील गांधीतीर्थच्या कस्तुरबा सभागृह गांधी रिसर्च फाउंडेशन व जय हिंद लोकचळवळच्या तीन दिवसीय ग्लोबल परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते. याप्रसंगी व्यासपीठावर गांधी रिसर्च फाउंडेशनचे विश्वस्त तथा जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन, गुजराथ विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. सुदर्शन अय्यंगार, जय हिंदचे संस्थापक माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, जय हिंद महिला मंचच्या अध्यक्षा सौ. दुर्गा तांबे, सचिव नामदेव गुंजाळ आदी उपस्थित होते. या परिषदेमध्ये राज्यभरातून 250 युवक व युवतींनी सहभाग घेतला आहे.

जागतिक शांतेसाठी महात्मा गांधीजींचे विचार हे आजही संयुक्तीक आहे. जगात शांतता प्रस्तापित करायची असेल, तर गांधीजींच्या विचारांची गरज आहे. गांधी विचार हा मानवतेचा असून, त्यासाठी पक्ष जात प्रांत महत्त्वाचा नाही. इंडोनेशियामध्ये असतानाही माझ्या जीवनात गांधीजींच्या विचारांनी परिवर्तन घडविले आणि बाली येथे साधना आश्रम सुरू झाले. यातून ग्रामीण जीवनातसुद्धा यशस्वी होता येते याचे उदाहरण होता आले, असे ते म्हणाले.

आत्मिक शांतीतूनच सामाजिक शांतता राखता येते – अशोक जैन

समाजात जे संशोधन, सामर्थ्य आहे, त्याचा वापर विधायक कार्यासाठी केला पाहिजे. सामाजिक भीती दूर झाली पाहिजे. महात्मा गांधीजींच्या उन्नत विचारांवर आचरण केले पाहिजे. ‘मेरी भावना’ ही प्रार्थना रोज म्हणून त्यादृष्टीने जगता आले पाहिजे. एकादश व्रत हे प्रभावी असून ते समाजातील भीती दूर करते. आपण आर्थिक समृद्ध झालो, मात्र मानसिकदृष्ट्या समृद्ध झालो नाही. मानवतेबाबत आपली उपलब्धता काय याचा विचार आपण करत नाही. भौतिक प्रगती कितीही केली तरी आत्मिक शांती झाल्याशिवाय सामाजिक शांतता राखता येणार नाही, त्यामुळेच विश्वशांतीऐवजी व्यक्तिगत शांतीवर भर दिला पाहिजे. त्यासाठी महात्मा गांधीजींनी सांगितलेल्या मार्गावर व्रतस्थपणे चालले पाहिजे, असे सांगत महात्मा गांधीजींच्या विचारांतून प्रेरित होऊन, ‘सार्थक करूया जन्माचे रुप पालटू वसुंधरेचे’ याप्रमाणे श्रद्धेय भवरलालजी जैन जगले त्यांच्या विचारातूनच गांधी विचार युवकांपर्यंत पोहचविण्याचे कार्य गांधी रिसर्च फाउंडेशनतर्फे सुरू असल्याचे जैन इरिगेशन सिस्टीम्स लि. चे अध्यक्ष अशोक जैन यांनी सांगितले. सदृढ समाज निर्मितीसाठी गांधी विचारांवर आधारित तरुणांना संघटित करण्याचे विधायक कार्य जय हिंद लोक चळवळीच्या माध्यमातून होत आहे. मोलाच्या या कार्यातून संघटित, ग्रामविकासाठी प्रेरणासुद्धा मिळत आहे.

प्रास्ताविक माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांनी केले, त्यात त्यांनी जय हिंद चळवळीबाबत सांगितले. वाईट गोष्टींचा समाजात प्रसार होतो मात्र चांगल्या बाबींसाठी पुढाकार तरुण घेत नाही अशी स्थिती असतानाही जय हिंद चळवळीच्या माध्यमातून आदर्श समाज निर्माण करण्याचा प्रयत्न होत आहे. महात्मा गांधीजींच्या तत्वांवर प्रेम केले पाहिजे, अहिंसा हे प्रभावी शस्त्र नैतिक नेतृत्वातून प्रभावीपणे वापरले पाहिजे. जात, धर्म, भेद न मानता स्वत:ला बदलले पाहिजे, यातून जग बदलेल हा विचार देणारे गांधी रिसर्च फाउंडेशनचे गांधी तीर्थ हे प्रत्येक युवकासाठी प्रेरणास्थान आहे, असे ते म्हणाले. अशोक जैन, अगुस इंद्रा उदयन, डॉ. सुदर्शन अय्यंगार यांचा स्मृती चिन्हाद्वारे जय हिंदतर्फे सन्मान करण्यात आला. परिचय उत्कर्षा रुपवते यांनी केले. सूत्रसंचालन कपिल डोके यांनी केले. आभार प्रा. गणेश गुंजाळ यांनी मानले.

By sathidaradmin

खानदेशातील अग्रगण्य साप्ताहिक वृत्तपत्र, मागील ३२ वर्षांपासून वाचकांना सत्य आणि योग्य पद्धतीने बातम्या पुरवत आहे. आता डिजिटल युगात, साथीदार समूह आपल्या तंत्रज्ञ वाचकांसाठी न्यूज पोर्टलच्या स्वरूपात उपलब्ध आहे. म्हणून, खानदेश परिसरातील दैनंदिन अपडेट्ससाठी कृपया आमच्या वेबसाइटला भेट द्या. तसेच, आपल्या सूचना स्वागतार्ह आहेत. धन्यवाद. संपादकीय टीम साथीदार न्यूज नेटवर्क

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

या पानाची मजकूर तुम्ही कॉपी करू शकत नाही.