आमदार मंगेश चव्हाण यांची मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे मागणी
——————————————–
चाळीसगाव – (साथीदार वृत्तसेवा) करोना वैश्विक महामारीच्या परिस्थितीमध्ये कापसाची खरेदी थांबलेली आहे. चाळीसगाव तालुक्यात केवळ सत्यम कोटेक्स या एका केंद्रावर कापसाची खरेदी अतिशय कमी प्रमाणात होत आहे. त्यामुळे चाळीसगाव तालुक्यातील नोंदणीकृत शेतकऱ्यांचा कापूस घरातच पडलेला आहे. व्यापारी ३००० ते ४००० रु च्या भावाने कापूस खरेदी करत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा २००० ते २५०० रु प्रति क्विंटल तोटा होत आहे. समोर येणाऱ्या पावसाळ्यामुळे शेतकऱ्यांचा कापूस खरेदी करणे शक्य होवू शकणार नाही. त्यामुळे नोंदणीकृत शेतकऱ्यांच्या कापसाकरीता भावांतर योजना लागू करण्यात यावी अशी मागणी चाळीसगाव तालुक्याचे आमदार मंगेश चव्हाण यांनी पत्राद्वारे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे केली आहे.
सदर पत्रात नमूद करण्यात आले आहे की, या भावांतर योजनेमध्ये प्रति क्विंटल २००० रु प्रमाणे एक हेक्टरला २५ क्विंटल कापूस हे प्रमाण धरुन शेतकऱ्यांच्या सातबाऱ्याप्रमाणे कापूस खरेदी लागू करण्यात यावी. ज्यांचा कापूस घरात पडून आहे अश्या शेतकऱ्यांच्या याद्या प्रशासनाकडे तयार आहेत.
मागील वर्षी अतिवृष्टी व आता करोना लॉकडाउनमुळे शेतकरी अडचणीत आलेला आहे. या शेतकऱ्यांना वाचवण्याकरीता तातडीने भावांतर योजना लागू करण्यात यावी. त्याच्याकरिता कापसाची खरेदी होत नसलेल्या नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांकरीता रु. २००० क्विंटल प्रमाणे प्रति हेक्टर २५ क्विंटला भावांतर योजना लागू करण्यात यावी अशी मागणीही आमदार चव्हाण यांनी पत्राद्वारे केली आहे.