नगरविकास मंत्रालयाचे अप्पर सचिव श्रीमती प्रतिभा पाटील यांचे गौरवोद्गार
चोपडा (साथीदार वृत्तसेवा) मराठा समाजात निराधारांना, वंचितांना, उपेक्षितांना मदतीचा हात देऊन त्याच्या जीवनात पुनश्च आनंदाचे रंग भरून आपले आयुष्य सार्थक बनविणाऱ्या भास्करराव नाना पाटील यांच्या निःस्वार्थ भावनेने केलेल्या सेवेचा आदर्श समाजाने घ्यावा असे गौरवोद्गार नगरविकास मंत्रालयाचे अप्पर सचिव श्रीमती प्रतिभा पाटील यांनी केले.
राज्यस्तरीय आदर्श समाजरत्न पुरस्कार प्राप्त भास्करराव नाना पाटील (जानवेकर) ह.मु.चोपडा यांचे कार्य पाहून श्रीमती प्रतिभा पाटील यांनी मंत्रालयात भास्करराव पाटील यांचा नुकताच सत्कार केला.
जिल्हा परिषदेच्या अधीक्षकपदावरून निवृत्त झाल्यानंतर समाजसाठी काही तरी वेगळे करावे असा निश्चय मनाशी बांधून पाटील यांनी समाज कार्याला सुरवात केली. त्यात त्यांना मराठा समाजात पुनर्विवाह पध्दत सुरू करण्याचे निश्चित केले आणि त्यांनी सोशल मीडियावर व्हाट्सएपवर ‘मराठा समाज पुनर्विवाह’ असा ग्रुप स्थापन केला. या ग्रुपच्या माध्यमातून समाजात जनजागृती निर्माण करण्याचे काम सुरू केले. अल्प वेळेत विधवा, अल्प काळात फारकत, पती-पत्नी मध्ये सामंजस्य नसणे यावरून पत्नीला सोडून देने अशा मुली समाजात बसून राहत असल्याने त्यांचे पुनर्विवाह करून देणे त्याच पद्धतीने मुलांनादेखील मुली न मिळण्याचा त्रास होत होता तो त्रास या माध्यमातून कमी करण्यासाठी भास्करराव नाना पाटील हे कार्य करत आहेत. त्यांना त्यांच्या धर्मपत्नि शकुंतलाबाई पाटील हे सहकार्य करीत आहेत आणि पीडितांच्या जीवनात पुनश्च आनंदाचे सप्तरंग भरून देत आहेत भास्करराव नाना पाटील हे सर्व कार्य नि:शुल्क करीत असतात, हे विशेष. उलट त्यांचा स्वतःचे पैसे मोड करून विवाह जमवून देतात. त्यांना या कार्यात चोपडा येथील महात्मा गांधी महाविद्यालयाचे संचालक डॉ. बी. आर. पाटील (घोडगावकर), बी. एन. पाटील सर, सेवानिवृत्त मुख्याध्यापक पी. व्ही. पाटील, राजेन्द्र पाटील (शिरपूर), यांचेदेखील त्यांना सहकार्य मिळत आहे. या कार्यातून त्यांनी आजपर्यंत २५ ते ३० लग्न जमवून दिले आहेत.