सध्या ५५ हजार ६५१ रुग्णांवर उपचार सुरू – आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती
मुंबई – (साथीदार वृत्तसेवा) राज्याचा रुग्ण बरे होण्याचा दर सातत्याने ५०.४९ टक्के एवढा आहे. राज्यात आज दि. १९ जून रोजी १९३५ रुग्णांना घरी सोडण्यात आले असून, एकूण संख्या ६२ हजार ७७३ झाली आहे. दरम्यान, आज दि. १९ जून रोजी करोनाच्या ३८२७ नवीन रुग्णांचे निदान झाले असून, सध्या राज्यात ५५ हजार ६५१ रुग्णांवर (ॲक्टिव) उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.
राज्यात सध्या ६० शासकीय आणि ४३ खासगी अशा एकूण १०३ प्रयोगशाळा करोना निदानासाठी कार्यरत आहेत. दि. १९ जूनपर्यंत पाठविण्यात आलेल्या ७ लाख ३५ हजार ६७४ नमुन्यांपैकी १ लाख २४ हजार ३३१ नमुने पॉझिटिव्ह (१६.९ टक्के) आले आहेत. सध्या राज्याचे प्रति दशलक्ष प्रयोगशाळा नमुन्याचे प्रमाण ५३१७ एवढे असून, हे प्रमाण देशपातळीवर ४२१० एवढे आहे. राज्यात ५ लाख ९१ हजार ४९ लोक होम क्वारंटाइनमध्ये आहेत. सध्या २५ हजार ६९७ लोक संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत.
राज्यात १४२ करोनाबाधितांच्या मृत्यूची नोंद आज दि. १९ जून रोजी एकूण १४२ करोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. नोंद झालेल्या मृत्यूंपैकी आरोग्यमंडळनिहाय मृत्यू असे : ठाणे-१२४ (मुंबई ११४, ठाणे २, वसई-विरार ५, रायगड ३), नाशिक-९ (नाशिक, धुळे, जळगाव प्रत्येकी ३), पुणे-१ (सोलापूर १), औरंगाबाद-८ (औरंगाबाद ८).
आज, १९ जून रोजी नोंद झालेल्या मृत्यूंपैकी ८९ पुरुष तर ५३ महिला आहेत. एकूण नोंद झालेल्या १४२ मृत्यूपैकी ६० वर्षे किंवा त्यावरील ७४ रुग्ण आहेत, तर ५७ रुग्ण हे वय वर्षे ४० ते ५९ या वयोगटातील आहेत. यामध्ये ११ जण ४० वर्षांखालील आहेत. कोरोनामुळे राज्यात झालेल्या मृत्यूंची संख्या आता ५८९३ झाली आहे.