अखिल भारतीय तांत्रिक शिक्षा परिषद नवी दिल्ली यांची मान्यता
चोपडा (साथीदार वृत्तसेवा) महात्मा गांधी शिक्षण मंडळ संचलित श्रीमती शरदचंद्रिका सुरेश पाटील तंत्रनिकेतन महाविद्यालयात अखिल भारतीय तांत्रिक शिक्षा परिषद नवी दिल्ली यांच्याकडून नवीन अभियांत्रिकी महाविद्यालय सुरू करण्यास परवानगी प्राप्त झाली आहे.
सदर तंत्रनिकेतन महाविद्यालयाची स्थापना सन १९८३ मध्ये महाराष्ट्र राज्याच्या माजी शिक्षण मंत्री मा. कै.अक्कासाहेब शरदचंद्रिका सुरेश पाटील व संस्थेचे संस्थापक अध्यक्ष माजी आमदार (स्व.) डॉ सुरेश जी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. संस्थेचे विद्यमान अध्यक्ष ॲड.संदीप पाटील, उपाध्यक्ष आशाताई पाटील व संस्थेच्या सचिव डॉ. स्मिता पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सदर तंत्रनिकेतन महाविद्यालय मागील ४० वर्षापासून तांत्रिक शिक्षणामध्ये विद्यार्थी घडवण्याचे कार्य करत असून महाविद्यालयाचे विद्यार्थी हे शासकीय व अशासकीय क्षेत्रामध्ये उच्चस्त पदावर कार्यरत आहेत.
तालुक्यातील विद्यार्थ्यांना अभियांत्रिकी महाविद्यालयाचे शिक्षण घेण्याकरिता तालुक्या बाहेर जावे लागत असे. या सर्व गोष्टींच्या विचार करून संस्थेने चोपड्यातच अभियांत्रिकी महाविद्यालय सुरू करण्याचे मानस ठेवला होता. तंत्रनिकेतन महाविद्यालयात स्थापत्य अभियांत्रिकी, संगणक अभियांत्रिकी, विद्युत अभियांत्रिकी व यांत्रिकी अभियांत्रिकी या शाखा सुरू असून, नवीन अभियांत्रिकी महाविद्यालयात संगणक अभियांत्रिकी, विद्युत अभियांत्रिकी, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलेकम्युनिकेशन अभियांत्रिकी व यांत्रिकी अभियांत्रिकी या शाखा सुरू करण्यात आलेल्या आहेत.
यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य श्री. व्ही. एन. बोरसे यांनी महाविद्यालयात सद्यस्थितीत सुरू असलेले सर्व शाखांची तसेच आता मान्यता मिळालेल्या अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या संबंधित माहिती दिली. आजवर संस्था विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्नशील होती व यापुढेही विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी संस्था सकारात्मक प्रयत्न करेल. तसेच तालुक्यातील विद्यार्थ्यांना तांत्रिक शिक्षणाच्या लाभ देण्यास कटिबद्ध असेल अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष ॲड संदीप पाटील यांनी दिली.
तंत्रनिकेतनचा विद्यार्थी राज्यात प्रथम
श्रीमती शरदचंद्रिका सुरेश पाटील तंत्रनिकेतन महाविद्यालयाचा विद्यार्थी मैत्रेय वाणी हा राज्यात प्रथम आला होता. महाविद्यालयाची देदीप्यमान कामगिरी सुरूच आहे. याच महाविद्यालयाने तालुक्यासह ५० किलोमीटरच्या परिसरातील गोरगरिबांच्या विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाची सुविधा मिळावी या उद्देशाने अभियांत्रिकी महाविद्यालयास मान्यता मिळाल्याने एक नव चैतन्य निर्माण झाले आहे.